मराठी माणूस कोण, याची एक साधी-सोपी पण अर्थपूर्ण व्याख्या आचार्य प्र.के. अत्रे यांनी केली होती. ज्याला तुकोबाचा एकतरी अभंग तोंडपाठ येतो, तोच अत्र्यांच्या मते खरा मराठी माणूस! याच चालीवर असे म्हणता येईल की, 'ग्यानबा - तुकाराम' हा मंत्र ज्याच्या कानी पडलेला नाही असा एकतरी मराठी माणूस आढळेल का? 'ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस ' या शब्दात जिचे वर्णन केले जाते, त्या परंपरेशी प्रत्येक मराठी माणूस प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे जोडलेला असतो. 'ग्यानबा-तुकाराम' याप्रमाणे 'शिवाजी महाराज की जय' या मंत्रानेसुध्दा मराठी माणूस भारलेला असतो. अशी काय बरं जादू आहे ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवाजी या नावांमध्ये? ही तुमच्या-आमच्यासारखीच हाडा-मांसाची माणसे होती; पण कालच्या आणि आजच्या मराठी समाजाला व्यापून राहिलेल्या सांस्कृतिक बंधुभावाची ती महान प्रतीके होती. अशा प्रतिकांद्वारे आपल्याला परंपरा कळते, संस्कृती कळते, इतिहास कळतो. पण इतिहास म्हणजे अशा प्रतिकरूप व्यक्तींची निव्वळ चरित्रे मात्र नव्हेत. या व्यक्तींनी ज्या समाजाचे प्रतिनिधित्व केले, त्या समाजाची सर्वांगीण कथा म्हणजे इति